Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

खरंच

खरंच एकतरी कारण रहायला हवं होतं,
तुझ्या स्वराशिवाय माझ्या शब्दांनी गायला हवं होतं|
शब्द-सूर सगळेच विखुरले,
वादळापूर्वी पावसाचं गाणं तरी गुणगुणायला हवं होतं|
हे रेशीमबंध नुसतेच जुळत गेले,
तुझी होईन का?शेवटचं विचारायला हवं होतं|
माझ्याभोवती तुझे अतृप्त श्वास घुटमळले,
एकदा तरी त्यात उर भरुन जगायला हवं होतं|
श्वासागणिक जुळताना मुळं रूजतंच गेली,
ते उमाळे जागवायला मन रितं व्हायला हवं होतं|
आता कोरडं दुःख घेऊन का जाळताय?
यापूर्वीच काळजानं खाक व्हायला हवं होतं||

११ जून,२००५
सांगवी

दुःख अंतरीचे

दुःख अंतरीचे आता ओठावरती ना येवो|
सुख इतुके की आता,दव आसवात थिजो||
लळा इतुका जगाचा,कधी कुणाला लागेल?
बंध इतुके नाजूक,तरी जपाया पाहील||
जीवा सांत्वन अपुले,आपणच करणार|
साथी सवंगडी आम्ही,उद्या पुन्हा भेटणार||
ओढ आसक्त प्रेमाची,उधळ्ती हे दिवस?
त असता,धरू अजून कुठली ती आस||
मोती मातीतले या,जरी दूर देशी गेले|
तरी या छायेत यायला,तयाचे जीव घुटमळले||
किती वरीस सरले,आता किती उराशी राहिले?
एका क्षणासाठी इथे,आम्ही कोटी जीव ओवाळले||

३० मे,२००५
सांगवी

सांज माझ्या मनी…

रंग कोशातले गंधले हे तनी|
प्रीत उधळीत सांज माझ्या मनी||
रक्तिमा हा नभीचा पाजळे का भूवरी?
बावरी ही दिशा काजळे का अंबरी?
तारका-चांदण्या असता जरी उराशी|
सलते ही रात्र तुजविण उशाशी||
रात जागून कोमेजली तरीही कर्दळ खुलते|
अधरावरती जरी न लाली तरी तांबडे फुटते||
कूस उलटून छळवून रात्र जाई|
पेंगुळ्ली पहाट रित्या ओळीतच राही||
धुंद होऊन अखेरले बरसून ये तू|
चिता तरी आज माझी विझवून जा तू||

४ मे,२००५
सांगवी

‘दर्दे-जलन’

लाशों के उस ढेर में
और एक लाश आ पडी|
मौत से पहले ही
नमाजे-जनाजे पे चल पडी||
अब तक हुए दर्द को,
वो अब सह ना सकी|
मौला मुझें उठालो,
चिल्ला के रो पडी||
न उसके हाथों मे जान थी,
न आखों में रौशनी|
जले हुए जिस्म से,
बस चिपकी थी एक ओढनी||
जिसके सीने की धडकन थी,
उसीने ही क्यों आग से लिपटा दिया?
इश्क-ए-करबला में क्यों,
इस हुस्न को जलाकर खाक किया?
इतने में किसी ने ,
उसके मुहपर मिट्टी ढकेल दी|
धीरे से उसकी भी ,
कब्र बन गयी||
रोने लगी वो क्ब्र में तो आवज सुनीं,
बहन,ये सभी लाशे तेरी तरह ही है|
क्यों रो रहीं हो इस बेवफा जिंदगी पर,
जिसकी मौतपर भी दुनिया को गम न हो?
उतने में फिरसे
और एक लाश आ पडी|
मौत से पहले ही
नमाजे-जनाजे पे चल पडी||

१३ नोव्हेंबर,२००४
सांगवी

‘श्रावण’

आता त्या गुलाबी थंडीतलं धुकंही हवंहवंसं वाटतं,
तुझ्या स्पशातला दव कधी संपूच नये असं वाटतं,
कालपर्यंत हे नुसतंच कोरडं चित्र होतं,
स्वप्नातला श्रावण त्यात इतक्या लवकर बरसेल,
असं वाटलंच नव्हतं…

सावरता सावरता आता तूच बेधुंद केलंयस,
पण आता याच धुंदीत असंच राहावंसं वाटतंय,
हाच पाऊस पुन्हा-पुन्हा बरसावासा वाटतोय,
शब्दप्रीतीत कवितेलाही भिजवावंसं वाटतंय.

पण अशावेळी तू अशब्द होऊन खूपकाही बोलून जातोस,
हातातला हात सोडवत माझे शब्दही घेऊन जातोस,
निरोप घेण्याचं सामर्थ तुझ्यात असतं न माझ्यात,
आता तो श्रावण डोळ्यातूनच झरत असतो,
या प्रीतीसाठी जणू तोही झुरत असतो…
झुरतानाही तो बरसत असतो…
पण आता ते बरसणंही पूर्वीसारखं नसतं

१२ सप्टेंबर,२००४
सांगवी

‘क्षण असेही…’

क्षण असेही फुलतात काही…
सारे असून जवळी बोलायला शब्दच सुचत नाहीत,
निश्चल ओठ शब्द सोडून नुसतेच थरथरतात,
थरथरलेल्या त्या फुलावर हळूहळू दव दाटतात,
दवात दडतं डोळ्यातून झरणारं मन,
मिळतं तिथंच तुझ्यासाठी झुरणारं तन.

क्षण असेही फुलतात काही…
वाटतं तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच नाही,
या टिपु-या चांद्ण्यात माझं आभाळ रितंच राही,
पिठुरल्या रात्रीत माझा चंद्र कुठं हरवला बाई?
काळ्या ढगामंदि की मनाच्या कवाडामंदि?
वेडं हे मन आठवणींचं धुकं तुडवीत जाई,
धुक्यातल्या त्या दवातही तुलाच शोधत राही.

क्षण असेही फुलतील काही…
प्रत्येक श्वासागणिक तुझं माझं जीवन एक होईल,
ते तुझं माझं पासून आपलं असेल काही,
आपल्या घरासमोर प्राजक्त बरसेल,
पुन्हा त्याच रात्री तुझ्या मिठीत पाहून चंद्रही हसेल,
क्षण फुलताना,फुलणारे फक्त त्यानेच पाहिलेले,
क्षण असेही स्वप्नात फुलतील काही…
क्षण असेही फुलतात काही…
क्षण असेही फुलतील काही…

१८ जुलै,२००४
सांगवी

‘आज मितीला’

नियतीचा खेळ म्हणून सर्वांसाठी खपायचं,
पण एक क्षण तरी स्वतःसाठी जगायचं|
सारं संपलं म्हणत नाही घुसमटायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||

तुटणारे बंधही तू अलवार सलग केलेस,
बंधनात तुटताना आज स्वतःच मरण का पत्करलेस?
एक गाण्ं सुखाचं आपणही गुणगुणायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||

नसतील आज नाती नात्यात गुंतून जायला,
नसतील आज मेघही तुझ्यावर बरसायला|
आसवेच आपुली पाऊस होऊन भिजायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||

आहेत अजून निखारे राखही फुलवायला,
आहेत अजून कूंचले,अपुरे ‘ते’ चित्र रंगवायला|
जळक्या वसंतातही आता पुन्हा बहरायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||

२३ जून,२००४
सांगवी

रात्री तुम्हाला निरोप देताना,
माझ्या डोळ्यात आसवं नसतीलही…
आपण उद्या पुन्हा भेटणार या पोकळ भावनेनं
अश्रू काही काळ थबकले असतील…
पण पहाटेच्या मंद झुळुकेनं मला भानावरच आणलं,
आणि शब्द जणू अश्रूतून ओघळू लागले…

ते विनायकचं बोलणं,रवीची धीरगंभीरता,
सुशांतची चिडचिड,गोव्याची बडबड,दादांच्या गझला…
हे सगळं पुन्हा केव्हा एकत्र येणार?
का हीच या ऋणानुबंधांची अखेरची गाठ असणार?

इतके दिवस प्रवाहाबरोबर राहण्याची सवय झाली,
फेअरवेलच्या नावाखाली विभक्त होणारी प्रवाहं आम्हालाही कळली,
हेच कटू सत्य पचवायलाच का(?)
तुम्ही आम्हाला फेअरवेल मागत होता.

काळोखाच्या क्षितिजावर सोनेरी किरण स्पर्श करतीलही…
पण या दरम्यानचा काळ केवळ तुमच्या आठवणींवर सावरणं एक आव्हानच आहे.
त्या आठवणीच आठवणींना अस्वस्थ करताहेत,
पण तुमच्याशिवाय त्या आठवणीही निरसंच वाटताहेत…
दुरावणा-या माझ्याच नात्यांकडे पाहून आज माझे शब्दसुद्धा रडताहेत …
(म्हणून तर कविता संपलीय, असं वाटतयं)

१२ एप्रिल,२००४
(बी.ई. farewell च्या दिवशी)

‘अस्तित्व’

आता तुझं नसणंच
तुझ्या अस्तित्वाची साक्ष देईल…
नसणा-या अस्तिवात
तुला शोधताना काळाचं
अस्तित्वही संपून जाईल.

‘तुझं रूप’

कर्णिकेच्या परिमलानं गंधलेलं तुझं रूप,
दवात चिंब ओलावलेलं तुझं रूप,
फिकट रंगात सोनेरी पहाट खुलवणारं तुझं रूप,
निसर्गाच्या लावण्याची उधळ्ण करणारं तुझं रूप,
दाहकतेच्या जाणिवेनंही कळवंडणारं तुझं रूप,
कोमेजलेल्या त्या स्पर्शातही सुगंधित करणारं

तुझं रूप.

२० फेब्रुवारी,२००४
सांगवी

जरा जुन्या पोस्ट्स »

Follow

Get every new post delivered to your Inbox.